ज्वारी : किडींचे व रोगाचे व्यवस्थापन
खरीप व रब्बी हंगामातील ज्वारीचे
उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी किडींचा/रोगाचा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे
कारण आहे. खोडकिडा, खोडमाशी, मीजमाशी,
तुडतुडे, मावा, कोळी, कणसातील अळी, लष्करी अळी, हुमणी इत्यादीं किडींचा आणि
दाण्यावरील बुरशी,अरगट व तांबेरा या रोगाचा ज्वारी पिकावर
प्रादुर्भाव झाल्यास 50 टक्क्यापेक्षा जास्त
नुकसान होते. त्यामूळे ज्वारी पिकावर येणार्या महत्त्वाच्या किडी व रोगांविषयी माहिती होणे आवश्यक आहे.
अ) किडी -
1) खोडमाशी : ही माशी लहान आणि
करड्या रंगाची असते. अळीचा रंग पांढरा असतो. अधूनमधून पाऊस पडत
असल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. या किडीची अळी पोंग्यात प्रवेश करून
रोपाच्या वाढीचा खालचा भाग खाऊन नष्ट करते. या किडीचा प्रादुर्भाव पीक एक महिण्याचे होईपर्यन्त होतो. प्रयोगांती दिसून आले
आहे, की यामुळे ज्वारीच्या धान्याचे 40 ते 50 टक्के आणि कडब्याचे 30 ते 35 टक्के नुकसान होते.
2) खोडकिडा : खोडकिड्याचे पतंग मध्यम आकाराचे
असतात. पोग्यातील पानाच्या वर लहान लहान पारदर्शक व्रण आढळल्यास
खोडकिड्यांचा प्रादुर्भाव झाला असे समजावे. कोवळया पानावर आडव्या रेषेत लहान-लहान
छिद्रे पडलेली दिसतात. वाढणार्या शेंड्याला इजा होऊन विशिष्ट प्रकारची पोंगामर होते.
किडीचा प्रादुर्भाव साधारणतः पीक एक महिन्याचे झाल्यापासून कणसात दाणे भरेर्पंत होऊ शकतो. अळी ताटात शिरल्यानंतर आतील
गाभा खाते, त्यामुळे ताट आणि कणीस
वाळते.
3) मावा : ज्वारीवर 2 ते 3
प्रकारच्या माव्यांचा प्रादुर्भाव होतो. पहिल्या प्रकारातील मावा रंगाने
निळसर हिरवा असतो; मात्र पाय काळे असतात.
दुसर्या प्रकारचा मावा रंगाने पिवळसर असून, तो जुन्या पानाच्या खालच्या बाजूवर आढळून येतो. अनुकूल परिस्थितीत या माव्याची एक आठवड्यात
एक पिढी पूर्ण होते. हिरवा मावा पिकाच्या सुरुवातीच्या काळात पोंग्यात दिसून येतो. पोंग्यातील रस शोषून घेतल्यामूळे पाने पिवळी पडून
कालांतराने वाळतात. या किडीवर मोठ्या प्रमाणावर भक्षक भुंगेर्याची वाढ होते. माव्याच्या शरीरातून गोड
पदार्थ बाहेर पडतो आणि तो पानांवर पसरल्यामुळे काळी बुरशी वाढून
तिचे थर जमतात. त्यामुळे झाडाची हरितद्रव्याच्या सहाय्याने सूर्यप्रकाशात अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते व
विषाणुजन्य रोगाचा प्रसारही होतो.
4) तुडतुडे : तुडतुडे व त्याची पिले पोंग्याच्या पानातील रस शोषून
घेतात. किडीद्वारे झालेल्या इजेमूळे पानातून रस बाहेर पडून पानावर त्याचे साखरेत
रूपांतर होते. त्यामुळे पान चिकट होऊन त्यावर काळी बुरशी वाढते. त्याला चिकटा पडला, असे म्हणतात. किडीच्या प्रादुर्भावामूळे पाने पिवळी
पडून झाडाची वाढ खुंटते व कणीस बाहेर पडत नाही. किडीचे प्रमाण जास्त झाल्यास वरची पाने
पिवळी पडून वाळतात.
5) मीज माशी : ही माशी अतिशय लहान असून
तिचा पोटाकडचा भाग नारंगी व पंख पारदर्शक असतात. तापमान 25 ते 30 अंश सें., हवेतील
आर्द्रता 60 टक्कंपेक्षा
जास्त झाल्यास अळया सुप्तावस्थेतून बाहेर येतात. मादी माशी फुलावर तसेच परीपक्व होणार्या कणसातिल दाण्यावर
अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी फूलातील
बीजांडकोशावर उपजीविका करते. त्यामूळे कणसात दाणे भरत नाहीत. या किडीमूळे उत्पादनात 60 टक्के घट येते.
6) कोळी : कोळी रंगाने हिरवे असून पानाच्या खालच्या बाजूवर
वाढतात. त्या पानाखालील जाळीमध्ये मादी अंडी घालते. किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या कडेने सुरू
होऊन वार्याचे दिशेने वाढतो. कोळी पानाच्या खालच्या बाजूस राहून पानावर ज्या ठिकाणी
प्रादुर्भाव झालेला आहे, कालांतराने ते पूर्ण पाने लालसर होऊन वाळून
जातात व ताटे जमिनीवर लोळतात.
7) लष्करी अळी : या किडीचे पतंग
करड्या रंगाचे तर अळया काळया-चॉकलेटी रंगाच्या असतात. मादी पानाच्या देठाजवळ अगर
जमिनीत 20 ते 100 च्या समूहाने अंडी घालते.
भरपूर पावसानंतर किंवा पावसाच्या ताणानंतर या किडीची वाढ झपाट्याने होते. अळया अधाशासारखे पाने खाऊन फक्त मध्यशीरच शिल्लक
ठेवतात. निसवत असलेल्या कणसातही या अळयांचा प्रादुर्भाव होतो.
किडीच्या
प्रादुर्भावाची कारणे -
1) तापमान : 25 ते 30 अंश सें तापमानात ज्वारीवरील बहुतांश किडीची वाढ मोठ्या प्रमाणात होते.
पिवळया माव्याची वाढ कमी तापमान 15 अंश सें आणि ढगाळ
वातावरण असल्यास झपाट्याने होते.
2) आर्द्रता : हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 60 ते 80 टक्के हे ज्वारीवरील किडीच्या वाढीसाठी उपयूक्त ठरते. मात्र, पिवळा मावा, कोळी यांची वाढ त्यापेक्षा कमी आर्द्रता
असतानासुद्धा होते.
3) पाऊस : खरिपामध्ये तसेच ऑक्टोबर
महिण्यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यास ज्वारीवर खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो. एकदम जास्त पाऊस
पडल्यास ज्वारीवरील बर्याच किडी नष्ट होतात.
डिसेंबरमध्ये ढगाळ हवामान असेल,
तर माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाने ओढ दिली,
तर अशा परिस्थितीत खरपुडे, तुडतुडे, कोळी इ. किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
4) जमिनीचा प्रकार : रब्बी
ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात हलकी-मध्यम प्रकारच्या जमिनीखाली येते. अशा जमिनीत ओलावा साठवण्यास आणि तो टिकवून ठेवण्यास मर्यादा येतात. पावसाच्या प्रमाणात घट आल्यामुळे तुडतुडे, कोळी इ. किडीचा प्रादुर्भाव
वाढतो. भारी जमिनीची ओलावा साठवण्याची आणि ती टिकवण्याची क्षमता जास्त असल्यामूळे हवेतील
आर्द्रता वाढते. खोडमाशी, खोडकिडा, मावा,
कणसातील अळया यासारख्या किडीचे प्रमाण वाढते.
5) पेरणीचा कालावधी : रब्बी ज्वारी सप्टेंबरच्या दुसर्या पंधरवाड्यात पेरल्यास त्यावर किडीचा
प्रादुर्भाव कमी होतो. परंतु,
त्याच्या अगोदर व नंतर पेरलेल्या ज्वारीवर खोडमाशीचा
प्रादुर्भाव जास्त आढळून येतो.
उशिरा पेरलेल्या ज्वारीला
तुडतुडे, मावा यांच्यापासून नुकसान
पोहचते. एकाच परिसरात वेगवेगळया वेळेला पेरणी केल्यास बर्याच किडीचा प्रादुर्भाव
वाढतो. खरीप ज्वारी 7 जुलै नंतर पेरु नये.
6) ताटांची संख्या : खरीप हंगामात
1.78 लाख तर रब्बी हंगामात ओलिताखाली 1.80 लाख आणि
कोरडवाहू 1.48 लाख ताटांची
संख्या प्रतिहेक्टरी असावी, अशी शिफारस करण्यात आलेली आहे.
तथापि हे प्रमाण कमी असल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. यापेक्षा
ताटांची संख्या जास्त असल्यास किडीपासून नुकसान कमी जाणवते.
7) खतांची मात्रा : शिफारस केलेल्या रासायनिक खतांची मात्रा पिकास दिल्यास किडीचा
प्रादुर्भाव कमी होतो. परंतु,
असतोल आणि अयोग्य खतांच्या मात्रा दिल्यास किडीचे प्रमाण वाढते.
8) वाण : स्थानिक वाणाखाली रब्बी ज्वारीचे
क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सुधारित वाण आणि संकरित वाण यांच्या खालील
क्षेत्र अल्प प्रमाणात आहे. किडीला प्रतिकारक्षमता नसणारे वाण, संकरित वाण यांचा वापर केल्यास किडीचा
प्रादुर्भाव वाढून पिकाचे नुकसान होते. अशा वाणांचा वारंवार वापर झाल्यास किडीचा
प्रादुर्भाव सातत्याने दिसून येतो.
ब) रोग –
1) दाण्यावरील
बुरशी (ग्रेन मोल्ड )-
ज्वारीचे दाणे
परिपक्व होत असताना पीक पावसात सापडल्यास बुरशीची वाढ होते व दाणे कुजतात. या
रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.
2) अरगट – या
रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे व जमिनीतील बुरशीच्या गाठीमुळे होतो. बिजाण्ड
कोशातून तांबडा, पांढरा साखरेसारखा द्रव निघतो व कालांतराने दाण्याऐवजी
बुरशीच्या भुरकट गाठी तयार होतात.
3) तांबेरा
4) पानावरील पट्टे
5) डाउनी मिल्ड्यु
किडी व रोगाचे एकात्मिक व्यस्थापन -
1) मशागत : एक नांगरणी, दोन पाळया पेरणीपूर्वी
देणे.
2) स्वच्छता : मशागतीनंतर
पूर्वीच्या पिकाची धसकटे, चिपाडे, बांधावरील गवत, तण काढून आणि वेचून एकत्र करून नष्ट करणे.
3)
खोडमाशीमुळे पोंगे मर झालेली झाडे उपटून नष्ट करावीत.
3) किडींना की बळी पडणार सुधारित/संकरित
वाणांची निवड करणे.
सुधारित वाण :
खरीप – एसपीव्ही 960 (PVK 400), एसपीव्ही 946, परभणी श्वेता,पिव्हीके 809.
रब्बी - मालदांडी 35-1, स्वाती, माउली,
फूले यशोदा, फूले वसुधा व फूले चित्रा, परभणी
मोती.
संकरित वाण : खरीप - सी.एस.एच.14, सी.एस.एच.16, सी.एस.एच.25 (परभणी
साईनाथ)
रब्बी - सी.एस.एच.15 आर,
सी.एस.एच.19 आर
4) बीजप्रक्रिया : कार्बोसल्फान 25 एसटीडी - .200 ग्रॅम. प्रतिकिलो बियाण्यास किंवा थायमेथोक्झाम 35 एफ एस 10 मीलि. प्रतिकिलो बियाणे, तसेच ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम, अॅझोटोबॅक्टर 25 ग्रॅम, पीएसबी 25 ग्रॅम – या
क्रमाने प्रती किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. ( खरीप हंगामात ज्वारीच्या
उशिरा पेरणीसाठी 7 ग्रॅम ईमिडाक्लोप्रिड 70 ड्ब्लुएस प्रती किलो बियाणे बीज
प्रक्रिया करावी.)
5) पेरणीची वेळ : खरीप – 7 जुलै पर्यन्त
आणि रब्बी - सप्टेंबर दुसरा पंधरवडा
6) खते : शिफारस केल्याप्रमाणे
7) बियाण्याचे प्रमाण : खरीप 7.5
किलो प्रती हेक्टर आणि रब्बी 10-12 किलो प्रति हेक्टर
8) अंतर : दोन ओळींतील-45 सेंमी., दोन रोपांतील
-12.5 सेंमी. (खरीप)
दोन ओळींतील-45 सेंमी. दोन
रोपांतील -15 सेंमी.(रब्बी)
9)
खोडकीडीच्या व्यवस्थापणासाठी ट्रायकोग्रामा चिलोणीस या परोपजीवी किटकांचे 1.50 लाख
प्रती हेक्टर 30 ते 40 दिवसांनी दोनदा
प्रसारण करावे.
10) विरळणीपूर्वी
खरपुड्यांचा प्रादुर्भाव दिसल्यास 5 टक्के
निंबोळी अर्काची फवारणी करावी.
11) विरळणी :
पिकाची उगवण झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी खोडमाशीचा
प्रादुर्भाव झालेली रोपे काढून नष्ट करून
विरळणी करणे.
12) आंतरशागत :
पहिली कोळपणी/खुरपणी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी तर दुसरी कोळपणी/खुरपणी पेरणीनंतर पाच आठवड्यांनी व तिसरी
कोळपणी/खुरपणीनंतर आठ आठवड्यांनी करावी.
13) पीक काढणीनंतर
नांगरट करून धसकटे वेचून जाळून टाकणे.
रोग नियंत्रण –
एकात्मिक पद्धतीचा सर्वप्रथम अवलंब करावा आणि नंतर -
-
दाण्यावरील बुरशीसाठी व अरगटसाठी पहिली फवारणी पीक फुलोर्यावर
आल्यावर व दुसरी फवारणी 10-12 दिवसांनी आलटून पालटून पुढील बुरशींनाशकाची करावी.
कॅप्टन 50% - 1000 ग्रॅम / थायरम 75% - 1000
ग्रॅम / झायरम 80% - 1000 ग्रॅम प्रती
500 लीटर पाण्यात मिसळून करावी.
-
तांबेरा या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी पहिली फवारणी पीक
फुलोर्यावर आल्यावर व दुसरी फवारणी 10-12 दिवसांनी आलटून पालटून पुढील बुरशींनाशकाची
करावी.
झायनेब 75% - 1250 ग्रॅम / मॅनकोझेब 80% -
1500 ग्रॅम प्रती 500 लीटर पाण्यात मिसळून
करावी.
कीड नियंत्रण –
1)
खोडमाशी – पहिली फवारणी उगवणी नंतर 7 दिवसाचे आत आणि गरज
पडल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणी नंतर 10 दिवसांनी करावी यासाठी स्पिनोसॅड 5 एस
सी 60 मिलि प्रती 300 लीटर पाण्यात किंवा बिव्हेरिया बॅसियाना किंवा मेटारायझिअम
अॅनिसोप्ली 1.50 किलो प्रती हेक्टर हवेत आर्द्रता असेल तर फवारावे.
2)
खोडकिडा – ग्रासित झाडे उपटून नष्ट करावीत. फोरेटसारखे
दानेदार कीटकनाशक पोंग्यात टाकावे.(खोडकिडा व लष्करी अळीसाठी). प्रती हेक्टरी एक
प्रकाश सापळा लावावा. गावामध्ये प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. फवारणीसाठी कार्बारील
50% - 2000 ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस 20% - 1250 मिलि प्रती 500 लीटर पाण्यातून
फवारावे.
3)
मावा / तुडतुडे – ईमिडाक्लोप्रिड 17.8% - 100 मिलि किंवा
डायमिथोएट 30% - 500 मिलि किंवा मिथील डिमेटॉन 25% - 400 मिलि प्रती 500 लीटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
4)
कोळी – 300 मेश गंधक भुकटी 30 किलो प्रती हेक्टर धुरळावी.
5)
कणसातिल अळ्या / जाळी करणार्या अळ्या / हेलिकोव्हरपा – यासाठी क्विनालफॉस 25% - 1000 मिलि किंवा
कार्बारील 50% - 2000 ग्रॅम प्रती 500 लीटर पाण्यातून फवारावे.
6)
चिकटा, मावा आणि डेल्फासिड – निंबोली अर्क 5%
किंवा डायमिथोएट 30% - 500 मिलि किंवा मिथील डिमेटॉन 25% - 400 मिलि प्रती 500
लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
7)
कणसावरील मिजमाशी – यासाठी ज्वारीची पेरणी लवकरात लवकर
करावी( शक्य झाल्यास संकरीत ज्वारी 20 जून ते 30 जून दरम्यान करावी ), झोनल
पद्धतीचा अवलंब करावा, मोसमी पावूस होण्यापूर्वी कुटार, भुसा यांचा नाश करावा, फवारणी सकाळी लवकर करावी आणि
आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी 5 दिवसांनी करावी.
मॅलेथिओन 50% - 1000 मिलि किंवा कार्बारील 50% - 2000 ग्रॅम
500 लीटर पाण्यातून फवारावे.